जर तुमचे बाळ खाण्यासाठी त्रास देत असेल आणि काहीच खात नसेल तर तुम्ही त्याच्या खाण्यासंबंधी असे काही उपाय करू शकता.
१. सफरचंदाचा गर- सफरचंदाचे तुकडे करून पाणी घालून उकळावे. थोडे थंड करून मिक्सरमधून काढून बाळाला चमच्याने द्यावे.
२. उकडलेल्या बटाट्यात तूप/ लोणी घालून कुस्कुरून द्यावे. चवीला मीठ घालावे.
३. दात येत असताना बाळाला कुरतडायला बिस्किटे / पाव द्यायला काही हरकत नाही. म्हणजे दातांचे शिवशिवणे कमी होईल.
४. पौष्टिक खिचडी – तांदूळ, मूग, लाल भोपळ्याचे तुकडे, गाजराचे तुकडे, आल्याचा ठेचा, जिरे आणि पाणी घालून खिचडी शिजवावी. वरून तूप किंवा लोणी घालून बाळाला द्यावे.
५. बाळासाठी दही – १०० मिलीलिटर दूध आटवून त्याचे ६० मिलिलिटर घट्टसर दूध करावे. या दुधाचे दही लावावे. म्हणजे थोड्या दह्यातून जास्त उष्मांक मिळतील.
६. गव्हाचे पीठ, बेसन, तूप, साखर मिसळून कणिक मळावी.
७. भाज्यांचे सूप
१. टमाटे, कांदा, गाजर एकत्र उकडावेत. मिक्सर मधून काढून मीठ, मिरी, घालून उकळी आणावी.
२. पालक, दुधी, कांदा, बटाटा, मूग डाळ / तूर डाळ एकत्र करून शिजवून मिक्सर मधून काढावी. वरून लोणी घालावे. मीठ, मिरी, चवीपुरता.
३. कोबी, फरसबी, गाजर, कांदा, वाटाणा, एकत्र उकडावेत. सूप करून वरून व्हाईट स्वास घालावा. व्हाईट स्वास – दूध, आटा, लोणी, गॅसवर एका भांड्यात परतावे. ( मंद आचेवर) वरून थोडे- थोडे दूध घालून ढवळत राहावे. घट्टसर खमंग शिजल्यावर थंड करावे. त्याच्यात हळूहळू सूप ओतावे. गॅसवर गरम मिठी- मिरी घालावी.
८. तांदूळ भाजून पाण्यात एक तास भिजत ठेवावेत. मग जास्त पाणी घालून कुकरमध्ये शिजवावे. मऊ शिजलेल्या भातात मीठ, मिरपूड, जिरे, तूप घालून बाळाला भरवावे.
साभार : डाँ. आश्विनी भालेराव- गांधी